Incomplete Mahabaleswar Trip
मी तसा जास्त बोलणारा प्राणी नाही, मला कमी बोलायला आवडतं. त्यामुळे स्वतःहून कुणाशी ओळख वगैरे करण्याच्या फंदात मी पडत नाही. अनोळखी व्यक्तींपासून मी जरा दूरच राहतो. का कुणास ठाऊक, पण नाही आवडत मला कुणाशीही स्वतःहून बोलायला. अगदी सुरुवातीपासुनच, म्हणजे लहान होतो तेंव्हापासूनची हि सवय. होय सवयच म्हणावी लागेल आता.
त्याची अन माझी ओळख कशी झाली आणि कधी आम्ही घनिष्ट मित्र झालो हे काही आठवत नाही. एवढं मात्र आठवतंय कि, ज्यावेळी मी रवी ला भेटायला अमरापूरला जायचो त्यावेळी हा हि तिथे असायचा. रवी माझा जवळचा मित्र जो माझा वर्गमित्र होता आणि नंतर जिवलग मित्र बनला. या दोघांचं काय बोलणं चालायचं मला काही कळायचं नाही. सर्व डोक्यावरून जायचं. अगदी तासनतास काय गप्पा मारायचे त्यांनाच ठाऊक. मला वाटायचं कि पूर्ण गावाची चिंता करण्याचे काम यांच्याकडेच आहे. मी मात्र त्यांच्या सोबत असतांना खुंटीला बांधलेल्या बोकडासारखा कधी रवीकडे तर कधी त्याच्याकडे पहायचो व नुसतीच मान हालवायचो, कधी उत्सुक्तेने, कधी प्रश्नार्थक नजरेने तर कधी काही समजल्याच्या अविर्भावात. ते त्यांच्या गप्पांमध्ये एव्हढे रंगलेले असायचे कि माझे अस्तित्व हे शुण्याप्रमाणे असल्यागत व्हायचे. मलाच कधी कधी गळ्यातून चित्र विचित्र आवाज काढून किंवा बळेच खोकून त्यांचे लक्ष वेधून घ्यावे लागायचे. ज्यावेळी कथा, कादंबर्या, चित्रपट, गाणी आणि टेक्नोलॉंजी असे विषय निघायचे त्यावेळीच मला संधी मिळायची तोंड उघडण्यासाठी, अन जसे कि मी सांगितले मी जास्त बोलत नाही त्यामुळे माझे विषय लवकर संपायचे आणि मग मला पुन्हा गप्प बसण्याशिवाय पर्याय नसायचा व मी पुन्हा एक उत्तम श्रोता बनायचो. असो ! कदाचित त्यांच्या या अघळ पघळ बोलण्यामुळेचं मला पण थोडे फार बोलण्याचे कौशल्य प्राप्त झाले असेल नाहीतर हा जो आज मी इतकं बोलायला लागलो ते काय उगाचंच का!
त्याचा मित्र परिवार खूप मोठा, लहानांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत. त्याचं बोलणही सगळ्यांशी आपुलकीचं त्यामुळे कुणीही त्याला आपला अगदी जवळचा मित्रच समजतो आणि तो तसा आहेही. सर्वांशी अगदी सलोख्याने आणि प्रेमाने वागणारा एक आदर्श मित्र. त्यामुळे जर कुणीही म्हणाले कि महेश माझा जवळचा मित्र आहे तर तो आहे, त्यात काही दुमत नसेल. होय ! इतक्यावेळ मी महेश बद्दलच बोलत होतो. महेश मला दोन इयत्तेने जेष्ठ आहे. पण आम्ही समविचारी असल्यामुळे मला तसे कधी जाणवले नाही.
इतरवेळी शांत असणारा मी त्याच्यासोबत मात्र तासनतास गप्पा मारत असे. आम्हाला बोलण्यासाठी विषयांची कमतरता भासत नसत. आमच्यासोबतचे इतर मित्र वैतागून जायचे, अन म्हणायचे कि इतकं काय बोलता तुम्ही. कित्तेकदा असे झालेय कि मी आणि महेश बोलत बसलोय आणि बऱ्याच जणांनी आम्हाला जाता येता विचारलंय कि, तुम्ही अजून इथचं बोलतं बसलात काय? घरून पन्नास ते साठ वेळा फोन यायचा, कधी येतोय घरी विचारायला. पण आमचे बोलणे काही केल्या संपत नसायचे. नंतर नंतर तर घरी सांगायची गरज पडत नसे कि मी कुठे चाललोय किंवा कुणा सोबत आहे. घरचे समजून जायचे कि एकतर रवी सुट्टीला आला असेल म्हणून आपला मुलगा उशिरा घरी येतोय किंवा मग महेश सोबत असेल.
जर एखाद्याची चेष्टा आम्ही (मी आणि महेश) करायची ठरवली तर समोरचा एकदम त्रस्त होऊन जात असे. अर्थातच आम्ही फक्त गंमत म्हणून टांग खेचायचो. कुणालाही दुखः पोहचवण्याचा आमचा कधीही उद्देश नसायचा आणि समोरचा चिडत असेल तर मग थोडीशी चेष्टा करण्यात काय वाईट आहे. यावरूनच एक किस्सा मला आठवतोय. माझा अजून एक घनिष्ट मित्र आहे नितीन (मूळ नाव बदललेले आहे फक्त त्याला वाईट वाटू नये म्हणून) जो महेशचा पण जवळचा मित्र आहे. मी जेंव्हा पतसंस्थेत नोकरी करत होतो तेंव्हा नितीन पुण्याला नोकरीला होता. तो महिन्यातून एकदा तरी दोन दिवसांसाठी पुण्याहून गावाकडे यायचा. तो गावी आल्यावर आम्ही दोघे कित्तेकदा एकत्र अमरापुरला महेशला भेटण्यासाठी जायचो. त्यावेळीही आम्ही (म्हणजे मी आणि महेश )त्याची किंवा तो आमची हलकी फुलकी चेष्टा करायचो. पण त्यावेळी त्याने कधी राग धरला नाही, महेश आणि मला तर आमची चेष्टा केल्याचा काहीचं फरक पडत नसे. कारण आम्ही ते हसण्यावारी घ्यायचो आणि मैत्री म्हटलं कि चेष्टा मस्करी आलीचं.
नंतर काही वर्ष्यानी नितीनचे लग्न झाले आणि त्याचे गावाकडच्या मित्रांमध्ये बसने उठणे कमी झाले. याला अनेक करणे असतील, लग्न म्हणजे जबाबदारी. दोन कुटुंब एकत्र येतात, अनेक गोष्टी असतात, मला सर्वच माहिती आहेत असे नाही. आणि अश्यावेळी सहाजिकच मित्रांऐवजी घरच्यांना आणि घरातील नवीन व्यक्तीला जास्त वेळ देणे गरजेचे असते. आम्हाला या सर्व गोष्टी कळत नव्हत्या असे नाही पण आपला मित्र कितीही विवंचनेत असो वा आनंदात असो, चेष्टा, मस्करी करणे गरजेचे असते, जास्त गंभीर राहून सर्व प्रश्न सुटत नाहीत, तसे ते चेष्टेनेही सुटत नाहीत पण हसून खेळून त्याला सामोरं जाता येतं. मस्करी मित्र करणार नाहीत तर कोण करणार हे ब्रीद वाक्य समजून आम्ही त्याप्रमाने आमचा मैत्रीचा आहेर आम्ही त्याला वेळो वेळी देत राहिलो. पण त्याने कधीही या गोष्टीचा त्रास होत असल्याची कबुली दिली नाही व आम्हीही समजत गेलो कि तो समंजस आहे त्यामुळे आपण केलेली मस्करी तो गंभीरतेने घेणार नाही. आमचा उद्देश नेहमीच सात्विक होता. तसा तोही काही कमी नव्हता आम्हा दोघांना कधी कधी तो भारी पडायचा. तो राजा हरिश्चंद्र आंनी आम्ही ऋषी विश्वामित्र असे काही नव्हते. तोही चांगलीच परतफेड करायचा. अश्या या आमच्या मजेशीर मैत्री मध्ये फक्त चेष्टा, मस्करी एव्हढेच नाही तर इतर कोणत्याही परिस्थिती मध्ये एकमेकांच्या सोबत उभे राहण्यास आम्ही तत्पर असायचो, आत्ता हि तसेच आहोत. आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती कि आमच्या या नेहमीच्या खेळीमेळीच्या स्वभावाने तो इतका त्रस्त होईल आणि एकदिवस असं काही करेल कि आमच्या सततच्या चेष्टा, मस्करी करण्याला खुंट बसेल, अन तसे झालेही.
काही वर्ष्यांनी मी ही नोकरी करण्यासाठी पुण्याला आलो. मला पुण्यात येऊन २ वर्षे झाली असतील तेंव्हाची हि गोष्ट आहे. खूप दिवस झाले होते मी, महेश आणि नितीन एकत्र आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही एकत्र कुठे तरी बाहेर जाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली. जेथे आम्हाला एकमेकांशी खूप काही बोलतं येईल आणि जास्त वेळ सोबत व्यतीत करता येईल. एक प्रकारची छोटीशी सहलचं. साहजिकच मला ठरवायचे होते कि कुठे जायचे. मी पुष्कळ विचार करून आणि विविध मार्गांनी माहिती काढून, एक स्थळ निवडले. मी लगेच नितीनला फोन केला आणि विचारले, अरे नितीन! “महाबळेश्वरला जाण्यासंबंधी तुझा काय विचार आहे”. वाह! मस्त स्थळ निवडलंय, माझी काही हरकत नाही आणि तसेही आपल्याला ४ दिवस सुट्टी आहे. एक मुक्काम करावा लागला तरी चालेल, नितीन उत्तरला.
“छान! मग मी लगेच महेशला कळवतो. मी म्हणालो. “ ठीक आहे सांगून टाक आणि महेशला सांग कि १ दिवस अगोदर ये पुण्याला. नितीन म्हणाला.
मी लगेच महेशला कळवले कि आपण महाबळेश्वर ला जातोय तर तू तयारीला लाग. तुझी गावाकडची कामे उरकून घे आणि लवकर पुण्याला ये. महेश ने ही संमती दर्शविलीआणि आमचे महाबळेश्वरला जायचे निश्चित झाले. मी तर जाम खुश होतो कि किती छान झालं, आता सगळे पुन्हा एकत्र येऊन मस्त धमाल करू, हिंडू, फिरू, छान छान फोटोज काढू. निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेऊ. अन याहीपेक्षा मला आम्ही तिघे एकत्र भेटणार याचा आनंद जास्त होत होता.
महाबळेश्वरला जाण्यासाठी शनिवार निश्चित झाला होता. महेश शुक्रवारीच पुण्याला पोहचला होता. मी त्यावेळी होस्टेलमध्ये राहत होतो. संध्याकाळी आम्ही नितीनला फोन केला, इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलून झाल्यावर आमच्या नेहमीच्या गमतीदार स्वभावानुसार आम्ही फोनवरच त्याची गमंत करायला लागलो. यात काहीही नवीन नव्हते सगळे नेहमीप्रमाणेच. मी आणि महेश दोघेही अविवाहित आणि नितीनचे लग्न झालेले म्हणून नेहमी प्रमाणे महेशने नितीनला विचारले, “अरे नितीन ! पण तू वहिनींना विचारले का महाबळेश्वरला जाऊ का नको म्हणून?” नितीन म्हटला हो सांगितले मी , तू नको काळजी करूस. हो पण, परवानगी घेतलेले चांगले असते, नाही का? , महेश ने पुन्हा चिमटा घेतला. असं बऱ्याच वेळ महेश त्याची खेचत होता आणि मी आपला ऐकत होतो आणि मध्ये मध्ये महेशला वेगवेगळ्या कल्पना देत होतो. शेवटी फोन ठेवण्या अगोदर महेश पुन्हा म्हणाला, “अरे ऐक न नितीन, वहिनींना म्हणा कि तेव्हढा जेवणाचा डबा करून दिला तर छान होईल”. हो हो सांगतो आणि घेऊन येतो डबा, नितीन म्हणाला आणि फोन बंद केला. नंतर आम्हीही लवकर सगळं आवरून झोपी गेलो.
सकाळी महेश ने मला लवकर उठवलं. मी उठलो तो पर्यंत महेशची अंघोळपण झाली होती आणि तो सगळं आवरून बसला होता. मी पण पटकन आवरा-आवर केली आणि तयार झालो. सहजच वेळ पाहण्यासाठी फोन हातात घेतला. फोनच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसला. मी ओपेन केला तर तो मेसेज नितीनचा होता. मेसेज वाचून मला काय बोलावं काहीच सुचेना. मी काहीही न बोलता फोन महेश कडे दिला. अन खुणेनेच सांगितलं मेसेज वाच, महेशने मेसेज वाचला आणि स्तिमित नजरेने माझ्याकडे पाहत राहिला. थोडा वेळ आम्ही दोघेही काहीही न बोलता एकमेकांकडे द्विधा मनस्थित पाहत राहिलो. डोक्यात अनेक शंका येत होत्या... की काय झाले असेल? नितीनच्या घरी सगळे ठीक असेल ना? त्याची तब्येत बरी असेल ना? घरी कुणी पाहुणे आले असतील का अचानक? वहिनी नका जाऊ म्हणाल्या असतील का? या सर्व आमच्या प्रामाणिक शंकांनी डोक्यात काहूर माजलं होतं.
नितीनचा मेसेज – “मला तुमच्यासोबत उद्या महाबळेश्वरला येता येणार नाही, तुम्ही दोघे जाऊन या. हैप्पी जर्नी ! “ :(